आपली समाजव्यवस्था ही कुटुंबसंस्थेला महत्वं देणारी आहे. त्यामुळे पूर्वीपासून लोकं एकत्र कुटुंबात रहात आले आहेत. पण आता अनेक लोकं शिक्षण, नोकरी किंवा कामधंदा यासाठी शहरात येत आहेत किंवा कामाच्या निमित्ताने देशाबाहेर ही जातात. कुटुंब व्यवस्था ही संयुक्त होत चालली आहे. ‘हम दो हमारे दो’ किंवा ‘हम दो हमारा एक’ अशी कुटुंब होत चालली आहेत. तसेच आपली पुरुषप्रधान समाजव्यवस्था ही फार पूर्वीपासूनच स्त्रियांवर घर, मुलं, वडीलधारी मंडळी सांभाळण्याची जबाबदारी देत आलेली आहे. पण आता काही मुली/स्त्रिया शिक्षण घेतात, काम-नोकरी मुळे बाहेर पडत आहेत. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. त्यामुळे शहरात स्त्रिया जसा पूर्वी कुटुंबाला वेळ देत होत्या तसा देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबातील वडीलधारी माणसांना एक तर गावाला रहावं लागत किंवा शहरात घरात एकटं राहावं लागतयं.
गावाकडेही फारशी वेगळी परिस्थिती नाही. तिथेही स्त्रिया घरातली सर्व काम करून शेतात कामे करतात किंवा पशुपालन किंवा इतर व्यवसाय करत असतात. पण गावात लोकं जमिनीवर राहतात त्यामुळे लोकं एकमेकांच्या घरी सहज जातात. गावातलं वातावरण हे शहरांपेक्षा नक्कीच वेगळ आहे. तसं शहरात लोकं बिल्डिंग मध्ये राहतात त्यामुळे लोकांचा एकमेकांशी फारसा संवाद होत नाही.
एकूणच आताची तरुण पिढी आणि वडीलधारी मंडळी याच्या विचारात बराचसा फरक आहे. या दोन्ही पिढीमधील संवाद हळूहळू कमी होत चालला आहे. बऱ्याच वेळा या दोन्ही पिढीना एकमेकांचे विचार पटत नाहीत. त्यातून वाद होतात, एकमेकांपासून वेगळे होतात किंवा एकाच घरात असून एकमेकांमधला संवाद संपत चाललेला दिसतो. यासाठी जुन्या पिढीने ही नविन पिढीचे विचार स्विकारायला पाहिजेत, आपली मत त्यांच्यावर लादायला नकोत. तसेच बदलेल्या काळानुसार वडीलधाऱ्या मंडळीनी आपले विचार बदलायला पाहिजेत. तरुण पिढीने ही वडिलधाऱ्या मंडळीना प्रेम, आदराने वागवायला पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे आणि आपलं म्हणणं शांततेने त्यांना सांगायला पाहिजे. एकमेकांना समजून घेऊन सर्वानीच हा जीवनाचा प्रवास सुखकर करायला पाहिजे.
आपण या विभागात ज्येष्ठ नागरिकांवर होणारी हिंसा, त्यामागील कारणं, त्याच्या आरोग्यावर होणारे परिणाम आणि ज्येष्ठ व्यक्तींनी स्वतःची काळजी कशी घ्यावी. त्यांच्यासाठी असलेल्या योजना, कायदे याबद्दल सांगणार आहोत.