विवाहाच्या वैधते संबंधी हिंदू विवाह कायदा, १९५५ मधील तरतुदी

भारतीय संस्कृती मध्ये विवाहाला अनन्य साधारण असे महत्त्व दिले आहे. विवाह म्हणजे दोन व्यक्तींचे, दोन कुटुंबाचे मिलन. परंतु प्रेमाचे व आपुलकीचे हे नाते कधी-कधी योग्य ती चौकशी व काळजी न घेतल्याने मानसिक व शारीरिक छळाचे कारण होते. विवाह करताना कायदेशीर तरतुदींचे पालन न केल्याने विवाह अवैध मानला जातो व पुढे खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच, विवाह करताना कुठली काळजी घ्यावी, कायदा काय सांगतो हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती उपयुक्त ठरेल.

भारता मध्ये अनेक जाती – धर्मांचे लोक राहत असल्यामुळे, प्रत्येक धर्माचे वेगळे विवाह कायदे इथे अस्तित्वात आहेत. हिंदू व्यक्ती हिंदू विवाह कायदा, १९५५ अथवा विशेष विवाह कायदा, १९५४ अनुसार विवाह करू शकते. हिंदू विवाह कायदा अनुसार कायदेशीर विवाह बंधनासाठी खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे –

  • कोणत्याही दोन हिंदू व्यक्ती या कायद्या अंतर्गत विवाह करू शकतात. ‘हिंदू’ या शब्दाच्या व्याखे मध्ये शीख, जैन व बौद्ध लोकांचा देखील अंतर्भाव होतो. हिंदू विवाह कायदा अनुसार अंतर-धर्मीय विवाह करता येत नाही. अंतर धर्मीय विवाह, विशेष विवाह कायदा, १९५४ अंतर्गत करता येतो.
  • दोन्ही व्यक्ती विवाहाच्या वेळेस विवाहित नसाव्या, म्हणजेच त्या अविवाहित, घटस्फोटीत अथवा विधुर असाव्या. आपल्या जोडीदारापासून घटस्फोट घेतल्यावर अथवा त्याच्या/तिच्या मृत्युनंतर दुसरा विवाह करता येतो.
  • पती व पत्नी दोघंही मानसिक रित्या विवाह करण्यास व संमती देण्यास समर्थ असणे गरजेचे आहे.
  • पतीचे लग्नाच्या वेळेस वय कमीत कमी २१ व पत्नीचे कमीत कमी १८ असावे.
  • पती व पत्नी हे कायद्यामध्ये दिलेल्या प्रतिबंधित नातेसंबंधांमधील नसावेत. उदा. भाऊ – बहीण, आत्ते भाऊ – मामे बहीण, मामा – भाची, आत्या – भाचा अश्या नात्यांमधील दोन व्यक्तींच्या विवाहास कायदा मान्यता देत नाही. परंतु, अशा प्रकारचा विवाह करण्याची रूढी – परंपरा संबंधित पती पत्नींच्या समुदायांमध्ये प्रचलित असेल, तर मात्र असा विवाह करता येतो.
  • पती – पत्नी एकमेकांचे सपिंड नसावेत. अशा प्रकारचा विवाह देखील करण्याची रूढी – परंपरा संबंधित पती पत्नींच्या समुदायांमध्ये प्रचलित असेल, तर मात्र असा विवाह करता येतो.
  • विवाह हिंदू रिती रिवाजाप्रमाणे होणे गरजेचे आहे. जर पती – पत्नी च्या कुटुंब अथवा समुदाया मध्ये सप्तपदीची पद्धत असेल, तर सप्तपदी पूर्ण केल्याशिवाय विवाह संपन्न झाल्याचे मानले जात नाही.

वरील अटीं बघून आपल्या लक्षात येईल की हिंदू विवाह कायदा, काही बाबींमध्ये आपल्याला रूढी, परंपरा, रिती, रिवाज पाळण्याची मुभा देतो. मात्र सदर रूढी, परंपरा रिती, रिवाज हे पूर्वापार चालत आलेले व कायद्याला मान्य असणारे असावेत. तसेच ते कुठलाही खंड न पडता आजही संबंधित समुदयामध्ये पाळले जाणारे असावेत.

वर नमूद गोष्टींची पूर्तता करून संपन्न झालेला विवाह कायद्याने वैध मानला जातो.

हिंदू विवाह अवैध कधी होतो

विवाहासाठी आवश्यक तरतुदींची पूर्तता झाली नाही तर विवाह अवैध मानला जातो. खालील परिस्थितीं मध्ये विवाह अवैध होतो –

  • पती अथवा पत्नी विवाहित असताना जर दुसरा विवाह केला असेल, तर असा दुसरा विवाह अवैध मानला जातो.
  • पती-पत्नी कायद्यामध्ये दिलेल्या प्रतिबंधित नातेसंबंधांमधील असल्यास त्यांच्यामधील विवाह अवैध मानला जातो.
  • पती-पत्नी सपिंड असल्यास त्यांच्यामधील विवाह अवैध मानला जातो.

हिंदू विवाह रद्द बातल कधी करता येतो –

विवाह करताना काही तरतुदींची पूर्तता न झाल्यास विवाह जरी अवैध नसला तरी तो कोर्टातून रद्द बातल करून घेता येतो –

  • विवाहाच्या वेळेस पती अथवा पत्नी मानसिक दृष्ट्‍या सक्षम नसल्यास.
  • विवाह करताना फसवणूक करण्याच्या उद्देशाने महत्त्वाची माहिती लपवली असल्यास
  • विवाह जोर – जबरदस्तीने झाला असल्यास
  • पती अथवा पत्नी विवाह संबंध ठेवण्यास सक्षम नसल्यास.
  • पत्नी विवाहाच्या वेळेस त्रयस्थ व्यक्ती पासून गर्भवती असल्यास व ही माहिती पतीपासून लपवली असल्यास, विवाह झाल्यापासून १ वर्षाच्या आत पती कोर्टात दावा दाखल करून विवाह रद्द बातल करून घेऊ शकतो.

वरील सर्व विवाह मुळात अवैध नसून त्याला कोर्टात अर्ज करून रद्द बातल करून घेता येते. कोर्टात दावा हा ठराविक मुदतीत करावा लागतो.

विवाहाचे प्रकार –

वरील माहिती वाचल्यावर विवाहाचे तीन प्रकार आपल्या लक्षात येतात – वैध, अवैध आणि रद्द बातल करता येणारा विवाह. कायद्यानुसार आवश्यक असणार्‍या सर्व तरतुदींची पूर्तता केली तर विवाह वैध मानला जातो. अशा विवाहा मधील दोन्ही व्यक्तींना पती-पत्नीचे सर्व कायदेशीर अधिकार प्राप्त होतात. दोघांनाही एकाच्या मृत्युनंतर त्याच्या / तिच्या संपत्ती मध्ये कायदेशीर वारस म्हणून हक्क प्राप्त होतो. तसेच वैध विवाह अस्तित्वात असताना पती अथवा पत्नी दुसरा विवाह करू शकत नाही. परंतु, विवाह जर अवैध असेल तर दोन्ही व्यक्तींना पती-पत्नीचे कुठलेही हक्क व अधिकार प्राप्त होत नाहीत. असा विवाह मूलतःच अवैध असल्याने कोर्टातून तो अवैध असल्याचा हुकूम आणणे देखील बंधन कारक नसते. विवाह अवैध असल्याचा कोर्टातून हुकूम न आणता देखील पती अथवा पत्नी दुसरा विवाह करू शकते. अशा विवाहातील दांपत्यांना एकाच्या मृत्युनंतर त्याच्या / तिच्या संपत्ती मध्ये कायदेशीर वारस म्हणून काहीही  हक्क – अधिकार मिळत नाही. रद्द बातल करता येणारा विवाह मात्र कोर्टातून हुकूम आणेपर्यंत वैध मानला जातो आणि तो पर्यंत दोघांनाही पती -पत्नीचे सर्व हक्क अधिकार प्राप्त होतात. अशा विवाहाला कोर्टातून रद्द बातल करण्याच्या आत जर एकाचा मृत्यू झाला तर दुसरा त्याच्या संपती मध्ये कायदेशीर वारस म्हणून हक्क सांगू शकतो. तसेच, कोर्टाने या विवाहाला रद्द करे पर्यंत दोघंही दुसरा विवाह करू शकत नाही.

काही उदाहरणे-

  • अशोक, एक हिंदू धर्मीय आणि जसमीत, एक शीख धर्मीय व्यक्ती हिंदू विवाह कायद्या अनुसार विवाह करू इच्छितात? त्यांना कायद्याने हा विवाह करण्याची परवानगी आहे का? असा विवाह वैध मानला जाईल का?

उत्तर – हो. अशोक आणि जसमीत हिंदू विवाह कायद्या अनुसार विवाह करू शकतात. कारण हिंदू विवाह कायद्या मध्ये ‘हिंदू’ ह्या शब्दाच्या व्याखे मध्ये फक्त हिंदू नव्हे तर शीख, जैन आणि  बौद्ध लोकांचा देखील समावेश होतो.

  • मीना आणि अशोक हिंदू विवाह कायद्या अनुसार विवाह करतात. सदर विवाह अस्तित्वात असतानाच, अशोक सीमा ह्या दुसर्‍या मुलीशी विवाह करतो. अशोक असे करू शकतो का? मीना अशोक ला थांबवू शकते का? अशोक आणि सीमाचा विवाह वैध मानला जाईल का?

उत्तर – अशोक आणि मीनाचा विवाह अस्तित्वात असताना अशोक सीमा शी विवाह करू शकत नाही. अशोक आणि सीमाचा विवाह दुसरा विवाह असल्याने तो कायद्याने अवैध मानला जाईल. अशा विवाहाने अशोक व सीमाला पती – पत्नीचे कुठल्याही प्रकारचे हक्क व अधिकार मिळणार नाहीत. असा विवाह होणार असल्याचे समजल्यावर मीना कोर्टातून मनाईचा हुकूम आणून अशोक ला असा दुसरा विवाह करण्यापासून रोखू शकते. तसेच, पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसरा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे मीना अशोक विरुद्ध भारतीय दंड संहिता च्या आधारे फौजदारी गुन्हा देखील नोंदवू शकते.

  • मीना आणि अशोक हिंदू विवाह कायद्या अनुसार विवाह करतात. लग्नाला ५ वर्ष होऊन देखील मीना व अशोक ला मूल-बाळ न झाल्याने मीना अशोक ला दुसरा विवाह करण्यास आग्रह करते. मीनाच्या आग्रहामुळे अशोक मीना पासून घटस्फोट न घेता सीमा शी दुसरा विवाह करतो. अशोकच्या दुसर्‍या विवाहाला मीनानेच आग्रह केल्यामुळे हा विवाह वैध मानला जाईल का?

उत्तर – दुसर्‍या विवाहाला पहिल्या पती / पत्नी ची जरी मान्यता असली अथवा त्यांच्या आग्रहामुळे जरी असा विवाह करण्यात आला असला तरी असा विवाह अवैधच ठरतो. अशोक आणि मीनाचा विवाह अस्तित्वात असताना अशोक सीमा शी विवाह करू शकत नाही. अशोक व सीमाला पती – पत्नीचे कुठलेही हक्क -अधिकार प्राप्त होणार नाहीत. तसेच, पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसरा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशोक विरुद्ध भारतीय दंड संहिता च्या आधारे फौजदारी कार्यवाही देखील होऊ शकते.

  • मीना आणि अशोकचा हिंदू विवाह कायद्या अनुसार विवाह झाल्यावर अशोकला कळते कि मीना काही मानसिक आजाराने त्रस्त आहे. मीनाच्या या मानसिक अवस्थेची काहीही कल्पना अशोकला विवाहापूर्वी देण्यात आली नव्हती. अशोक आणि मीनाचा विवाह वैध आहे का? अशोक अशा परिस्थिती मध्ये काय करू शकतो?

उत्तर – वरील उदाहरणामध्ये अशोकची काहीही चूक नसून त्याची फसगत झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे, या परिस्थिती मध्ये कायदा अशोकला आपला निर्णय घेण्याची मुभा देतो. तो जर मीनाला तिच्या आजारासकट स्वीकारू शकत असेल तर तो तिच्या बरोबर विवाह बंधनात राहू शकतो. परंतु जर त्याला मीना बरोबर राहणे मान्य नसेल तर तो मीना च्या आजाराचा व स्वत:ची झालेल्या फसगतीचा पुरावा कोर्टात देऊन विवाह रद्द बातल करून घेऊ शकतो.

  • मीना १४ वर्षांची असताना तिचा विवाह २१ वर्षीय अशोकशी केला जातो. ती १६ वर्षांची असताना तिला या विवाह बंधनातून मुक्त वहावेसे वाटते. मीना ला काय करता येईल?

उत्तर – हिंदू विवाह कायद्या अनुसार वधूचे विवाहाच्या वेळेस वय कमीत कमी १८ व वराचे कमीत कमी २१ पूर्ण असणे गरजेचे आहे. विवाह करत असताना पती अथवा पत्नी पैकी कोणाचेही वय कायदेशीर मर्यादेपेक्षा कमी असेल तर असा विवाह ‘बाल – विवाह’ म्हणून गणला जातो. वरील उदाहरणामध्ये मीनाचे वय कायद्याने सांगितलेल्या मर्यादे पेक्षा कमी असल्याने त्यांचा विवाह – बाल विवाह म्हणून मानला जाईल. हिंदू विवाह कायद्या अनुसार, बाल विवाह मधील पत्नी आपल्या पती पासून घटस्फोट घेऊ शकते. परंतु घटस्फोट घेण्याकरिता खाली दिलेल्या शर्तींची पूर्तता करणे गरजेचे आहे –

  • विवाह करताना वधूचे वय १५ वर्षांपेक्षा कमी असावे.

ब. घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज करताना पत्नीचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त व १८ वर्षांपेक्षा कमी असावे.

वरील दोन्ही अटींची पूर्तता केली तर कोर्ट इतर कुठलेही कारण न बघता घटस्फोटाचा अर्ज मान्य करू शकते. मीना वरील दोन्ही अटींची पूर्तता करत असल्यामुळे ती घटस्फोटासाठी अर्ज करू शकते.

हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोट घेण्या व्यतिरिक्त मीना बाल विवाह प्रतिबंध कायदा मधील तरतुदींचा देखील उपयोग करू शकते. बाल विवाह प्रतिबंध कायद्या अनुसार, पती व पत्नी दोघेही सज्ञान झाल्यावर पुढील २ वर्षात हा बाल विवाह कोर्टातून रद्द बातल करून घेऊ शकतात. म्हणजेच पत्नी १८ ते २० वर्षे पूर्ण होईपर्यंत व पती २१ ते २३ वर्षे पूर्ण होईपर्यंत हा बाल विवाह कोर्टातून रद्द बातल करून घेऊ शकतात. मीना आत्ता १६ वर्षांची असल्यामुळे बाल विवाह प्रतिबंध कायद्यामधील तरतुदींचा तिला वापर करायचा असेल तर तिला ती १८ वर्षांची पूर्ण होईपर्यंत थांबावं लागेल.

बाल विवाह प्रतिबंध कायदा अनुसार एखाद्या सज्ञान व्यक्तीने बाल विवाह करणे, असा विवाह करण्यास एखाद्याला भाग पाडणे, अशा विवाहाला उपस्थित राहणे, व अशा विवाहाला सहाय्य करणे कायदेशीर गुन्हा असून अशा सगळ्यांवर फौजदारी कार्यवाही होऊ शकते.

  • मीनाचा विवाह तिचा मामेभाऊ अशोक याच्या शी होतो. सदर विवाह वैध आहे का?

उत्तर – मीना आणि अशोकचे नाते हे हिंदू विवाह कायद्या अनुसार प्रतिबंधित नात्यांमध्ये येते. त्यामुळे त्यांचा विवाह अवैध मानला जाईल. परंतु जर त्या दोघांच्या घराण्यांमध्ये अथवा समुदायांमध्ये पूर्वापार चालत आलेल्या रूढी – परंपरा प्रमाणे असा विवाह करण्याची पद्धत असेल तर असा विवाह वैध मानला जातो.

  • मीना आणि अशोक एका मंदिरा मध्ये जाऊन हार घालून विवाह करतात व एकत्र राहण्यास सुरवात करतात. त्यांचा विवाह वैध आहे का?

उत्तर – हिंदू विवाह कायद्या अनुसार विवाह करताना वधू अथवा वर यांच्या घराण्यातील रूढी – परंपरा अनुसार विवाह करणे आवश्यक आहे. अशा रूढी – परंपरा मध्ये जर सप्तपदीचा समावेश असेल तर सप्तपदी पूर्ण केल्याशिवाय विवाह पूर्ण झाल्याचे मानले जात नाही. मीना अथवा अशोक च्या घराण्यातील रूढी – परंपरा अनुसार जर सप्तपदी करणे गरजेचे असेल तर फक्त हार घालण्याचा विधी केल्यावर विवाह पूर्ण होणार नाही व त्यांचा विवाह अवैध मानला जाईल.

वर्षा खंडागळे
सहाय्यक प्राध्यापक
आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे