स्वतःवर होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार न करण्याच्या शिकवणुकीमुळे मुलींना त्यांच्या आयुष्यात अनंत प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. मारहाण होणे, संशय घेतला जाणे हा आपल्यावर होणारा अन्याय आहे. याची जाणीवसुद्धा स्त्रियांमध्ये आजपर्यंत फारशी निर्माण केली गेलेली नाही.
घराबाहेर आणि घरातही स्त्रीवर अत्याचार होतो, तेव्हा त्याबाबत कोणाशी बोलायचे, अन्यायाला वाचा फोडायची. याचे पुरेसे मार्गदर्शन स्त्रियांना कोणी करत नाही. एखाद्या स्त्रीने तक्रार केलीच तर समाजाचे दडपण तिला गप्प राहाण्यास भाग पाडते. सामाजिक दडपणांमुळे विधवा, परित्यक्ता, अविवाहित आणि विवाहित स्त्रियांना अन्याय सहन करावा लागतो.
कुटुंबाअंतर्गत होणा-या हिंसेमध्ये कित्येकदा स्त्रियांना गंभीर दुखापत होते, अकारण मृत्युमुखी पडावे लागते. कौटुंबिक हिंसेचा हा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. जात, वंश, धर्म, वय, वर्ग, देश, भाषा या कशाच्याही मर्यादा या प्रश्नाला नाहीत.
हिंसा सर्वच जाती, धर्म व वर्गाच्या स्त्रियांवर होते. त्यावर उपाययोजनासुद्धा तितकीच व्यापक हवी. एकीकडे हिंसेच्या दुष्टचक्रात अडकलेल्या स्त्रियांसाठी सुरक्षा नियोजन व इतर पर्याय शोधणे, आणि दुसरीकडे शोषणावर आधारित सर्व व्यवस्थांचे उच्चाटन करणे, इतके हे काम व्यापक आहे.
मासूम संस्थेच्या (पुणे-सासवड) ‘संवाद’ या कुटुंब सल्ला केंद्रामध्ये अनेक स्त्रिया कौटुंबिक हिंसेबाबत तक्रारी घेऊन येतात. त्यातील बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या नातेवाइकांकडूनच जीवघेणी मारहाण झालेली आहे. कित्येक जणींच्या जीवावरही बेतले आहे. तरीही माहेरचा आधार नसल्यामुळे आणि समाजाच्या दडपणामुळे त्यांना सासरचे घर सोडणे शक्य होत नाही. कमालीच्या असुरक्षित परिस्थितीमध्येसुद्धा नाइलाजाने, आज न उद्या परिस्थिती बदलेल अशा आशेवर स्त्रिया जगत असतात. हिंसाग्रत स्त्रिया त्यांच्या राहत्या घरामध्ये स्वतःची आणि मुलांच्या जिवाची काय काळजी घेऊ शकतील, याचा विचार करून सदर सुरक्षा नियोजनाची आखणी केली आहे. सुरक्षा नियोजन हे कौटुंबिक हिंसेवरचे उत्तर खचितच नाही. पण घरगुती वाद मिटत नाहीत, घरातले वातावरण पूर्ववत होत नाही, तोपर्यंतच्या काळात स्त्रीच्या जिवाला धोका होऊ नये याची खबरदारी घेणे एवढीच सुरक्षा नियोजनाची सीमित भूमिका आहे. आपण केलेल्या सुरक्षा नियोजनातून हिंसाग्रस्त व्यक्ती जास्त सबल झाली तर पुढच्या आयुष्याबद्दलचे निर्णय घेण्याचे धाडस व क्षमता तिच्यामध्ये नक्कीच येईल.
कौटुंबिक हिंसा ही सर्वात जवळच्या माणसांकडून होत असते व ती ही घरासारख्या सर्वात सुरक्षित मानल्या गेलेल्या ठिकाणी होते. यातून स्त्रीच्या मनात प्रचंड असुरक्षितता निर्माण होते. सुरक्षा नियोजन करताना हे लक्षात ठेवले पाहिजे. हिंसाग्रस्त स्त्रीला हिंसेला तोंड देण्यासाठी विचारपूर्वक केलेल्या सुरक्षा नियोजनाची निश्चितच मदत होते. परिस्थिती समजून घेऊन त्यात बदल घडवून आणण्यात सुरक्षा नियोजनाची मदत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. स्त्रिया काही वेळेस कौटुंबिक हिंसेमुळे निराश होऊन स्वतःला इजा करून घेतात. प्रसंगी आत्महत्येचाही मार्ग स्वीकारतात. अशा वेळेस स्त्रियांनी मनातली निराशा झटकून टाकावी, स्वतःचे आयुष्य आणि अस्तित्व महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्यावे आणि बिकट परिस्थितीतही सावध राहून स्वतःला सुरक्षित ठेवावे, यासाठी सुरक्षा नियोजनाचा उपयोग होऊ शकतो.
कौटुंबिक हिंसेची वारंवारिता, हिंसेचा प्रकार, हिंसक व्यक्ती व हिंसाग्रस्त व्यक्तींचे स्वभाव, त्यांचे सामाजिक व आर्थिक स्थान या सर्वांवर सुरक्षा नियोजन अवलंबून असते. एका विशिष्ट पद्धतीने वागल्यास हिंसा जास्त किंवा कमी होईल, असे हमखास मापदंड घालून देणे अशक्य आहे.
कौटुंबिक हिंसेविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्या व स्थानिक महिला मंडळ सदस्य स्वतःच्या विवेकबुद्धीने स्त्रीच्या परिस्थितीचा विचार करून तिला सुरक्षा नियोजन करण्यास मदत करू शकतील. प्रत्यक्ष नियोजन करत असतनाच हिंसापीडित स्त्रीला तिचा आत्मविश्वास मिळवून देणे, तिच्यामधील असुरक्षितता दूर करणे गरजेचे आहे.
लग्नानंतर माहेरी भावाच्या संसारात मुलींना स्थान नसल्यामुळे मुलींनी सासरीच राहायचे असे त्यांच्या मनावर सतत बिंबवले जाते. पण जिवाला धोका असेल, किंवा माणुसकीची वागणूक मिळत नसेल, तर समाजनिंदेला घाबरून नवऱ्याच्या घरात हिंसा सहन करत का जगायचे? याबद्दल स्त्रियांना विचार करायला प्रवृत्त केले पाहिजे. केवळ जीव वाचवून राहणे यापलीकडे जाऊन सन्मानाने जगण्यासाठीचे विविध पर्याय स्त्रीपुढे मांडत राहिले पाहिजे. तिच्या सन्मानाने जगण्याच्या धडपडीला या सुरक्षा नियोजनाची जोड महत्त्वाची ठरेल.
आपल्या आसपासची, ओळखीची, जिवाभावाची किंवा अगदी अनोळखी, कधीही न पाहिलेली आठ लाख माणसं दर वर्षी या जगाला रामराम म्हणतायत. युद्धं, ...
महत्त्वाची कागदपत्रे हिंसाचार होण्याची चाहूल लागताच पुढील सर्व कागदपत्रे अथवा त्याच्या अधिकृत प्रती तुमच्याकडे आहेत, याची खात्री करून घ्या. लग्नपत्रिका ...
लहान मुलांना मोठ्यांच्या भांडणामध्ये घेणे चुकीचे आहे. पण आपला जीव धोक्यात येणार असेल तर त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याची व ...
व्यसनी व्यक्तींमुळे (विशेषतः दारू पिणाऱ्या नवऱ्यापासून) कुटुंबातील इतर सदस्यांना मानसिक, आर्थिक, तसेच शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. समाजात अपमानित व्हावे ...
कौटुंबिक हिंसेव्यतिरिक्त समाजात सार्वजनिक ठिकाणी मुली व स्त्रियांच्या होणा-या लैंगिक छळाबाबत काही सूचना पुढील टप्प्यात दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी लैंगिक ...
स्त्रीच्या मनातील आत्महत्येचा विचार धोकादायक परिस्थितीत स्त्रीची इच्छाशक्ती शाबूत असते तोवर ती विरोध करते, परंतु सतत होणाऱ्या मारहाणीनंतर तिच्यामध्ये परिस्थितीशी ...